मावळात अवकाळी पावसाने बाजरीच्या पिकाचे नुकसान   

वडगाव मावळ (वार्ताहर):अवेळी आलेल्या अवकाळी पावसाने मावळ तालुक्याच्या पूर्व पट्ट्याला झोडपून  काढत जोरदार वार्‍यांसह धुमाकूळ घातला.यामुळे काढणीस तयार असलेले बाजरीचे पीक आडवे झाल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.  
  
मावळ तालुक्याच्या पूर्वपट्ट्यातील तळेगाव, इंदोरी,नाणोली,सोमाटणे, नवलाख उंबरे,आंबी,वराळे, गोळेवाडी,वारंगवाडी,वडगाव कामशेत, शिरगाव,गहुंजे,बेबड ओहोळ,धामणे, गोडुंब्रे, साळुंब्रे, चांदखेड या पूर्वपट्यात असलेल्या गावांमध्ये मंगळवारी अवकाळी पावसाने प्रचंड तडाका दिला. आठ ते दहा तास झालेल्या या पावसाने सर्व जनजीवन विस्कळीत करून टाकले होते.
 
मावळ तालुक्यात ५०० हेक्टर वर उन्हाळी बाजरीचे पीक घेतले जाते. मावळ भागात उन्हाळ्यात पाण्याची सोय असलेले बरेच शेतकरी हे बाजरीचे आणि भुईमुगाचे तसेच बागायती भाजीपाल्याची पिके घेतात. साधारणपणे जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात बाजरी आणि भुईमूग पिकांची लोक पेरणी करतात. सध्या बाजरी काढण्याचा काळ आलेला असून शेतकरी काढण्याची तयारी करत असतानाच अचानकपणे अवकाळी पावसाने आणि त्याचबरोबर आलेल्या जोरदार वार्‍यामुळे बाजरीचे उभे पीके आडवी झाली. यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी या नुकसानीमुळे हवालदिल झाला आहे. गेला आठवडाभर मावळ तालुक्याच्या विविध भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे. त्यामुळे काही ठिकाणी शेतकर्‍यांची बाजरीची पिके धोक्यात आलेली आहे. 
 
मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसाने आणि त्याबरोबरच झालेल्या जोरदार वार्‍यामुळे बाजरी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे तसेच या भागातील आंबा व जांभूळ या फळांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. जोरदार वार्‍यांनी काढणीसाठी आलेला आंबा झाडावरून पडून नुकसान झाल्याने आंबा उत्पादक शेतकरी नाराज झाले आहेत.
 

Related Articles